अशा वळणावर येऊन थांबलंय आता आयुष्य जणू भासतो संपलाच आहे रस्ता पण तरीही पुढे जाण्याची ओढ... असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या... उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा धुमारे न फुटती कशाला आता दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना... कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली.. हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते... वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला.. कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं? गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही... वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू... आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच. पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे... ...