Skip to main content
सावळा.......
सावळा, ना काळा ना गोरा असा तो म्हणजे सावळा. या वर्णाला एक खूप सुंदर, प्रिय, लडिवाळ, खोडकर तरीही आश्वासक अशी एक किनार आहे एका नावाची. अगदी बरोब्बर ती किनार म्हणजेच ते नाव म्हणजेच कृष्ण!
               किती रूपं, किती छटा त्या मधुसूदनाच्या! श्रीकृष्ण संपूर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत! तो मनमोहन सर्वांना असं काही मोहून टाकतो की आपण त्याच्यात कधी गुंतलो हे कळतच नाही. हा घनश्याम कधी दुडदुड रांगणारा बाळकृष्ण असतो तर कधी यमुनातीरी मित्रासमावेत खेळणारा नंदलाल असतो. कधी गाईंसोबत वनात रमणारा वनमाळी तर कधी पाव्याची मधूर तान ऐकवणारा मुरलीधर. कधी गोकुलवासीयांच्या रक्षणार्थ गोवर्धन उचलणारा गिरीधर तर कधी कालियामर्दन करणारा कान्हा. हाच तो ज्याने कंस वधून मथुरेला मोकळा श्वास घेऊ दिला आणि हाच तो ज्याने हा मोकळा श्वास टिकावा म्हणून मथुरा सोडली आणि द्वारका बसवली आणि सोबत मिळवली एक पदवी, रणछोडदास! तरुणाईला भावणारा प्रियकर, वृद्धांना आवडणारा योगेश्वर ही सर्व रूपे त्याचीच तर आहेत!
               कर्णाच्या औदार्याचे कौतुक करत असतानाच "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?", असा परखड सवाल उठवणारा सुद्धा तोच. अर्जुनाला महायुद्धाला प्रेरित करणारा पण तोच आणि दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करणाराही तोच!
               कृष्ण! नुसतं उद्गारलं जरी हे नाव तरी कानात मंजुळ बासरीचे स्वर गुंजतात. सज्जनांना वाट दाखवणारा, दुर्जनांची वाट लावणारा एक वाटाड्या. फक्त द्वापारयुगामध्येच नाही तर कलियुगातही आपल्याला तोच वाट दाखवतो त्याने सांगितलेल्या गीतेतून. अनेक प्रसंग अनेक निर्णय घेताना याचीच मदत अनेकांनी घेतली आहे, घेत आहेत आणि घेत राहतीलही.
               तसं बघायला गेलं तर प्रभू श्रीराम सुद्धा विष्णूचाच अवतार! त्यांचीही प्रतिमा सावळीच. परंतु त्यांच्या प्रतिमेच्या मागोमाग येतो तो आदरभाव, कर्तव्यदक्षाता, वचनप्रियता, सत्याचा घोष आणि या सावळ्याच्या प्रतिमेसोबत येतो तो प्रेमभाव, कृष्णनीती(गरज असेल आणि दुसऱ्याचं फार नुकसान होतं नसेल तर खोटं बोलायला परवानगी), अल्लडपणा, लडिवाळ गोड हास्य! प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम तर श्रीकृष्ण हा पूर्णावतार!
               पण या पूर्णावताराला त्याच्या जीवन प्रवासात कधीतरी कोणाची तरी गरज भासली असेलच ना जशी आपल्याला त्याची भासते. तेव्हा त्याने काय केले असेल? नक्कीच त्यांचं एकूण चरित्र पाहता योग्य व्यक्तीचा सल्ला, मदत घेतलीच असणार.
               गोरा आणि काळ्याच्या मधला सावळा! तसंच काहीसं नाही का या दामोदराचं सारं आयुष्य? अनेकदा सत्य जिंकावं म्हणून थोड्याशा असत्याची घेतलेली मदत, योग्याचा विजय व्हावा म्हणून अयोग्याचा केलेला पाठपुरावा. हेच तर सांगतोय तो आपल्याला की कधीच सगळं गोरं किंवा सगळं काळं, सगळं बरोबर किंवा सगळं चूक असं नसतंच बऱ्याचदा त्याच्या मधलंच असं ते सावळ असतं. चित्ताकर्षक,हुरहूर लावणारं! म्हणूनच तर जगण्याला एक उमेद असते आनंद असतो ओढ असते जगण्याची!
               सावळ्याच्या रंगात रंगुनी सारे,
               जग हे वाटे सावळे गोजिरे।
               सावळ्याच्या बासरीचे स्वर,
               घुमती मनी सोजिरे।
               सावळ्याच्या ओढीने जाऊ त्या दिशेला,
               अन परतून येऊ घेऊन एक दिलासा,
               लढण्याचा, जगण्याचा ,परत परत
               पुन्हा पुन्हा।।
©उमा जोशी


Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...