सावळा.......
सावळा, ना काळा ना गोरा असा तो म्हणजे सावळा. या वर्णाला एक खूप सुंदर, प्रिय, लडिवाळ, खोडकर तरीही आश्वासक अशी एक किनार आहे एका नावाची. अगदी बरोब्बर ती किनार म्हणजेच ते नाव म्हणजेच कृष्ण!
किती रूपं, किती छटा त्या मधुसूदनाच्या! श्रीकृष्ण संपूर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत! तो मनमोहन सर्वांना असं काही मोहून टाकतो की आपण त्याच्यात कधी गुंतलो हे कळतच नाही. हा घनश्याम कधी दुडदुड रांगणारा बाळकृष्ण असतो तर कधी यमुनातीरी मित्रासमावेत खेळणारा नंदलाल असतो. कधी गाईंसोबत वनात रमणारा वनमाळी तर कधी पाव्याची मधूर तान ऐकवणारा मुरलीधर. कधी गोकुलवासीयांच्या रक्षणार्थ गोवर्धन उचलणारा गिरीधर तर कधी कालियामर्दन करणारा कान्हा. हाच तो ज्याने कंस वधून मथुरेला मोकळा श्वास घेऊ दिला आणि हाच तो ज्याने हा मोकळा श्वास टिकावा म्हणून मथुरा सोडली आणि द्वारका बसवली आणि सोबत मिळवली एक पदवी, रणछोडदास! तरुणाईला भावणारा प्रियकर, वृद्धांना आवडणारा योगेश्वर ही सर्व रूपे त्याचीच तर आहेत!
कर्णाच्या औदार्याचे कौतुक करत असतानाच "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?", असा परखड सवाल उठवणारा सुद्धा तोच. अर्जुनाला महायुद्धाला प्रेरित करणारा पण तोच आणि दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करणाराही तोच!
कृष्ण! नुसतं उद्गारलं जरी हे नाव तरी कानात मंजुळ बासरीचे स्वर गुंजतात. सज्जनांना वाट दाखवणारा, दुर्जनांची वाट लावणारा एक वाटाड्या. फक्त द्वापारयुगामध्येच नाही तर कलियुगातही आपल्याला तोच वाट दाखवतो त्याने सांगितलेल्या गीतेतून. अनेक प्रसंग अनेक निर्णय घेताना याचीच मदत अनेकांनी घेतली आहे, घेत आहेत आणि घेत राहतीलही.
तसं बघायला गेलं तर प्रभू श्रीराम सुद्धा विष्णूचाच अवतार! त्यांचीही प्रतिमा सावळीच. परंतु त्यांच्या प्रतिमेच्या मागोमाग येतो तो आदरभाव, कर्तव्यदक्षाता, वचनप्रियता, सत्याचा घोष आणि या सावळ्याच्या प्रतिमेसोबत येतो तो प्रेमभाव, कृष्णनीती(गरज असेल आणि दुसऱ्याचं फार नुकसान होतं नसेल तर खोटं बोलायला परवानगी), अल्लडपणा, लडिवाळ गोड हास्य! प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम तर श्रीकृष्ण हा पूर्णावतार!
पण या पूर्णावताराला त्याच्या जीवन प्रवासात कधीतरी कोणाची तरी गरज भासली असेलच ना जशी आपल्याला त्याची भासते. तेव्हा त्याने काय केले असेल? नक्कीच त्यांचं एकूण चरित्र पाहता योग्य व्यक्तीचा सल्ला, मदत घेतलीच असणार.
गोरा आणि काळ्याच्या मधला सावळा! तसंच काहीसं नाही का या दामोदराचं सारं आयुष्य? अनेकदा सत्य जिंकावं म्हणून थोड्याशा असत्याची घेतलेली मदत, योग्याचा विजय व्हावा म्हणून अयोग्याचा केलेला पाठपुरावा. हेच तर सांगतोय तो आपल्याला की कधीच सगळं गोरं किंवा सगळं काळं, सगळं बरोबर किंवा सगळं चूक असं नसतंच बऱ्याचदा त्याच्या मधलंच असं ते सावळ असतं. चित्ताकर्षक,हुरहूर लावणारं! म्हणूनच तर जगण्याला एक उमेद असते आनंद असतो ओढ असते जगण्याची!
सावळ्याच्या रंगात रंगुनी सारे,
जग हे वाटे सावळे गोजिरे।
सावळ्याच्या बासरीचे स्वर,
घुमती मनी सोजिरे।
सावळ्याच्या ओढीने जाऊ त्या दिशेला,
अन परतून येऊ घेऊन एक दिलासा,
लढण्याचा, जगण्याचा ,परत परत
पुन्हा पुन्हा।।
©उमा जोशी
सावळा, ना काळा ना गोरा असा तो म्हणजे सावळा. या वर्णाला एक खूप सुंदर, प्रिय, लडिवाळ, खोडकर तरीही आश्वासक अशी एक किनार आहे एका नावाची. अगदी बरोब्बर ती किनार म्हणजेच ते नाव म्हणजेच कृष्ण!
किती रूपं, किती छटा त्या मधुसूदनाच्या! श्रीकृष्ण संपूर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत! तो मनमोहन सर्वांना असं काही मोहून टाकतो की आपण त्याच्यात कधी गुंतलो हे कळतच नाही. हा घनश्याम कधी दुडदुड रांगणारा बाळकृष्ण असतो तर कधी यमुनातीरी मित्रासमावेत खेळणारा नंदलाल असतो. कधी गाईंसोबत वनात रमणारा वनमाळी तर कधी पाव्याची मधूर तान ऐकवणारा मुरलीधर. कधी गोकुलवासीयांच्या रक्षणार्थ गोवर्धन उचलणारा गिरीधर तर कधी कालियामर्दन करणारा कान्हा. हाच तो ज्याने कंस वधून मथुरेला मोकळा श्वास घेऊ दिला आणि हाच तो ज्याने हा मोकळा श्वास टिकावा म्हणून मथुरा सोडली आणि द्वारका बसवली आणि सोबत मिळवली एक पदवी, रणछोडदास! तरुणाईला भावणारा प्रियकर, वृद्धांना आवडणारा योगेश्वर ही सर्व रूपे त्याचीच तर आहेत!
कर्णाच्या औदार्याचे कौतुक करत असतानाच "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?", असा परखड सवाल उठवणारा सुद्धा तोच. अर्जुनाला महायुद्धाला प्रेरित करणारा पण तोच आणि दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करणाराही तोच!
कृष्ण! नुसतं उद्गारलं जरी हे नाव तरी कानात मंजुळ बासरीचे स्वर गुंजतात. सज्जनांना वाट दाखवणारा, दुर्जनांची वाट लावणारा एक वाटाड्या. फक्त द्वापारयुगामध्येच नाही तर कलियुगातही आपल्याला तोच वाट दाखवतो त्याने सांगितलेल्या गीतेतून. अनेक प्रसंग अनेक निर्णय घेताना याचीच मदत अनेकांनी घेतली आहे, घेत आहेत आणि घेत राहतीलही.
तसं बघायला गेलं तर प्रभू श्रीराम सुद्धा विष्णूचाच अवतार! त्यांचीही प्रतिमा सावळीच. परंतु त्यांच्या प्रतिमेच्या मागोमाग येतो तो आदरभाव, कर्तव्यदक्षाता, वचनप्रियता, सत्याचा घोष आणि या सावळ्याच्या प्रतिमेसोबत येतो तो प्रेमभाव, कृष्णनीती(गरज असेल आणि दुसऱ्याचं फार नुकसान होतं नसेल तर खोटं बोलायला परवानगी), अल्लडपणा, लडिवाळ गोड हास्य! प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम तर श्रीकृष्ण हा पूर्णावतार!
पण या पूर्णावताराला त्याच्या जीवन प्रवासात कधीतरी कोणाची तरी गरज भासली असेलच ना जशी आपल्याला त्याची भासते. तेव्हा त्याने काय केले असेल? नक्कीच त्यांचं एकूण चरित्र पाहता योग्य व्यक्तीचा सल्ला, मदत घेतलीच असणार.
गोरा आणि काळ्याच्या मधला सावळा! तसंच काहीसं नाही का या दामोदराचं सारं आयुष्य? अनेकदा सत्य जिंकावं म्हणून थोड्याशा असत्याची घेतलेली मदत, योग्याचा विजय व्हावा म्हणून अयोग्याचा केलेला पाठपुरावा. हेच तर सांगतोय तो आपल्याला की कधीच सगळं गोरं किंवा सगळं काळं, सगळं बरोबर किंवा सगळं चूक असं नसतंच बऱ्याचदा त्याच्या मधलंच असं ते सावळ असतं. चित्ताकर्षक,हुरहूर लावणारं! म्हणूनच तर जगण्याला एक उमेद असते आनंद असतो ओढ असते जगण्याची!
सावळ्याच्या रंगात रंगुनी सारे,
जग हे वाटे सावळे गोजिरे।
सावळ्याच्या बासरीचे स्वर,
घुमती मनी सोजिरे।
सावळ्याच्या ओढीने जाऊ त्या दिशेला,
अन परतून येऊ घेऊन एक दिलासा,
लढण्याचा, जगण्याचा ,परत परत
पुन्हा पुन्हा।।
©उमा जोशी

Comments
Post a Comment