Skip to main content
*आम्ही सगळ्या दुर्गा*
                   आज कॉलेजला सुट्टी होती आणि नवरात्रीचे दिवसही आहेत तर त्याचे निमित्त साधून मी आणि माझा लेक 'रत्नदुर्ग' किल्ल्यावरील भगवतीच्या दर्शनाला जाण्याचा बेत आखला. आजचा निळा रंग म्हणून दोघेही निळे कपडे घालून चॅन तयार होऊन निघालो माझ्या दुचाकीवरून.
                   "अलोट गर्दी असेल किल्ल्यावर", असं मनाशी म्हणत असतानाच गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. जवळ जवळ एक किलोमीटर लांब गाडी लावून आम्ही चालत चालत निघालो.
                      आजूबाजूला उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. सगळ्या कालियुगातल्या दुर्गा छान नटून थटून, आपली लेकरं बाळं सांभाळत, नवऱ्याशी बोलत, ओटीचं ताट सांभाळत चालत होत्या. मोठं मोहक दृश्य होतं ते.
                        पायऱ्या चढून देवळाच्या आवारात आलो तर दर्शनासाठीदेखील भली मोठी रंग होती. ती पाहून चिरंजीव म्हणाले,"मी मुखदर्शन घेतो. तू थांब रांगेत." एवढं बोलून स्वारी गेली फोटो काढायला. मी मात्र रांगेत उभी राहिले.
                        मागे, पुढे, बाजूला विविध वयाच्या, देवीचाच अंश ल्यायलेल्या सगळ्या दुर्गा सुंदर तयार होऊन देवीच्या दर्शनासाठी उभ्या होत्या. सासू-सून, बहिणी-बहिणी, मैत्रिणी, शेजारणी, मायलेकी अशा बऱ्याच जोड्या होत्या तिथे. काही जणी माझ्या सारख्या एकट्या पण असतील. पण मी तरी एकटी कुठे होते? आजूबाजूच्या सगळ्या माझ्याच तर सख्या होत्या फक्त अपरिचित!
                       बऱ्याच गोष्टी कानावर पडत होत्या. सासरची उणीदुणी, तर कोणाची कामावरची गाऱ्हाणी, कोणी आणखी काही तर कोणाची आपल्या भविष्याची बोलणी अशी सुरू होती. त्यातल्याच एकीला चिंता पडलेली. " एवढी गर्दी! गाभाऱ्यात ओटी तरी नीट भरू देतील की नाही?" तर दुसरी म्हणे, " आत नुसतं चला चला करतील. जरा म्हणून नीट शांतपणे नमस्कार करू द्यायचे नाहीत." पण कोणीही रांगेत उभे आहोत तर देवीचे नाव घेऊ असं करताना दिसत नव्हतं. असो.
                    एकूणच सगळीकडे नुसता उत्साहाचा धबधबा सांडत होता. त्या गर्दीत आपला एकटेपणा काही काळापुरता तरी लांब जात होता. देवीचं नाव घेत, आजूबाजूची गाऱ्हाणी ऐकत, गर्दीत माझं एकटेपण हरवत मी दर्शनासाठी पुढे सरकू लागले....

© उमा जोशी. ०२/१०/२०१९

PC: Google

Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...