Skip to main content

चिमणा नसलेलं घरटं....

एका जंगलात एक मोठा वृक्ष होता. खूप जुना एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखा तो जंगलाच्या मधोमध उभा होता. निश्चल, अभेद्य, पुराण आणि खंबीर. अनेक घरटी त्याच्या अंगाखांद्यावर होती. त्या घरट्यांतूनअनेक संसार अगदी सुरळीतपणे सुरू होते. चिमणा चिमणी आपला संसार काडी काडी करून जोडत होते. सगळे जण एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने नांदत होते.
                              प्रत्येकाचा संसार सुरू होता. कोणाला कमी तर कोणाला जास्त असं काही ना काही पदरात पडतच होतं आणि त्यात ती सर्व मंडळी खुश होती. चिमणा चिमणी दोघेही आपल्या आपल्या परीने आपलं घरटं सजवण्याचा, सावरण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. झालंच तर अगदी शेजाऱ्याला पण मदत करत होते, मदत मागत होते. सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं.
                              मग येतो विणीचा मौसम. घरट्यातून 3- 4, 3 -4 अंडी दिसायला लागतात. चिमणा चिमणी आलटून पालटून त्यांचं रक्षण, भरण-पोषण करत होते. सगळ्या घरट्यातून हेच चित्र पाहायला मिळत होतं. सगळीकडे कसा आनंदीआनंद होता. सर्वजण आतुर होते ते नव्या चिमुकल्या पिल्लांना पाहण्यासाठी.
                              निसर्गनियमाप्रमाणे अंड्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर आली. सर्व वृक्ष चिवचिवाटाने अगदी मोहरून गेला. सगळीकडे छोट्या छोट्या चोचा वासून ही चिल्लीपिल्ली सतत चिवचिवाट करत होती पण कोणालाच त्याचा त्रास होत नव्हता. उलट कौतुकच वाटत होतं सर्वांना.
                              दिसामासाने ही पिल्लं वाढत होती. वृक्ष अजून अजून मोठा होत होता आणि चिमणा चिमणी अजून अजून बिझी होत होती. पिल्लांना वाढवणं, त्यांचं भरण पोषण याची जबाबदारी ते आलटून पालटून उचलत होते. सगळं कसं अगदी सुरळीत चाललं होतं.
                              आणि हाय रे दुर्दैव! पावसाळ्याचे दिवस होते. सगळी खबरदारी चिमणा आणि चिमणीने घेतलेली. हे नित्याचंच होतं. दरवर्षीच तर आपण अशी खबरदारी घेतो की. पण यंदा देवाच्या मनात काहीतरी वेगळाच होतं.
                              यंदाचा पाऊस काहीतरी वेगळाच होता. ध्यानस्थ वृक्ष सुद्धा यंदा थरारला होता. अगदी वेड्यासारखा कोसळणारा पाऊस एक दिवस आपल्यासोबत चिमणीचं घरटंच घेऊन गेला. आणि सोबत तिचा चिमणासुद्धा. मागे राहिली ती, तिची पिल्लं आणि टीपं गळणारा म्हातारा वृक्ष.
                              तिने खूप आक्रोश केला. पावसाला, देवाला, दैवाला खूप बोल लावला. तिचा तो आक्रोश बाकी सगळ्या घरट्यानी ऐकला पण ते तिला आवरू शकले नाहीत. पण मग तिने ठरवलं आता आपण पुन्हा सुरूवात करायची. परत काडी काडी जोडायची, परत घरटं बांधायचं, नाही हारायचं, पिल्लांना मोठं करायचं. ती डगमगली नाही थोडीशी भ्याली पण सिद्ध झाली. आणि तो पुराण खंबीर वृक्ष होताच की तिच्या सोबत!
                              पुन्हा ढग विरले, आभाळ स्वच्छ झालं, सोनेरी सूर्यकिरणे पुन्हा पसरली. जो तो आपल्या व्यापात गुंतला. तशीच ती चिमणी पण आपल्या व्यापात गुंतली आणि चिमणा नसलेलं तिचं घरटं पुन्हा नांदतं झालं, चिमण्याच्या आठवणीसोबत पुढे जाऊ लागलं...

©उमा जोशी

PC: Google

Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...