Skip to main content
नदी.....
                  नदी- ईकारांत स्त्रीलिंगी. नदी-नदयौ-नद्या: प्रथमा एकदम संस्कृतच्या तासाला बसल्यासारखं वाटलं नाही ! नदी हा शब्द स्त्रीलिंगीच का बरे झाला असावा? स्त्री नाही का आपला उगम सोडून दुसरीकडे जाऊन विलीन होते तसच नाही का नदीचं पण? दूर डोंगरात उगम पावून अगदी पल्याड त्या सागरात जाऊन विलीन होते की नदी! म्हणूनच बहुदा नदी हा स्त्रीलिंगी शब्द असावा.
              असं म्हणतात की ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये! पण नदी जिथून उगम पावते तिथपासून ते अगदी जिथे सागराला जाऊन मिळते तिथपर्यंत सर्वांचे जीवन समृद्ध करत जाते. डोंगरावरून वाहत येताना सोबत गाळ घेऊन येते आणि संथ वाहते त्या प्रांतात काठावर तो गाळ पेरून जमीन कशी सुपीक करून जाते. स्त्रीचं पण तसंच नाही का? माहेरच्या संस्कारांचं संचित घेऊन सासरी पेरत मुलाबाळांना वाढवत सुपीक बनवत असते तीही अविरत अगदी नदीसारखी!
              संस्कृत भाषेत प्रत्येक शब्दाची विविध रूपे असतात विभक्तीप्रमाणे. नदीची पण अशीच अनेक रूपं बघायला मिळतात आपल्याला, ऋतूंनुसार; प्रदेशानुसार! पावसाळ्यात धोधो ओसंडून वाहणारी, हिवाळ्यात पाणी ओसारल्याने शांतपणे संथ वाहणारी आणि उन्हाळ्यात पाणी आटल्याने बऱ्याचदा एकाजागीच डबकं झाल्यासारखी साठून राहिलेली. पण हे तात्पुरतच! पुन्हा पावसाचं सरी धरणीवर बरसल्या की नदी परत खळाळून उठते, वाहते, मार्गक्रमण करते. स्त्रीचं पण तसंच बालवयात अल्लडपणे अवखळपणे बागडणारी, यौवनात संथपणे पण लयदार चालणारी आणि म्हातारपणी अनुभवाचं बोचकं सोबत घेऊन आपल्याच मुलानातवंडात रमणारी!
              इतिहासाचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की सगळ्या प्रगत संस्कृतींचा उगम आणि विकास हा नदीच्या काठाकाठानच झाला आहे. सिंधू, हडप्पा अगदी परदेशातल्या मेसोपोटेमिया, इजिप्शियन,माया वगैरे सगळ्याच संस्कृतीचा जन्म नदीकाठीच झाला त्या वाढल्या बहरल्या. नदीला जीवनदायिनी पण म्हणतात ते म्हणूनच. नदीकाठच्या सुपीक जमिनीवर शेती करत खरं तर शिकत शिकत मानवी वस्ती नदीकाठी स्थिरावली, वाढली. नदीचे पाणी शेतीसाठी वापरले तसेच वाहतुकीसाठीही त्याचा वापर झालाच की! त्यामुळे व्यापार उदीम वाढला. नदीपात्रात मासेमारी सारखे व्यवसाय वाढू लागले आणि सर्वत्र एक समृद्धी पसरली.
              नदी, डोंगरात उगम पावते तिथून सागराच्या ओढीने धावत सुटते, वाटेत येणारे अनेक अडथळे पार करत करत, अनेक ओहोळ; नाले; लहान लहान झरे या सर्वांना स्वतःमध्ये सामावून, काही वेळा वाट बदलून, काही वेळा पात्र रुंदावून, काही वेळा संथ होऊन पण शेवटी ती सागराला मिळतेच, समर्पित होते.
              स्त्रीचं पण तसंच आहे नाही का? अनेक गोष्टी तिच्या प्रगतीच्या आड येतात पण ती निडरपणे त्यांचा सामना करून वाहतच राहते. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन त्या घराचा उत्कर्ष करणं काय सोप्पं काम आहे काय? ती सुद्धा जीवनदायिनी आहेच की! मुलांना जन्म देऊन त्यांना संस्कारांचे शिक्षणाचे संचित देऊन समाजात तीच तर धाडते. अनेक खाचखळगे, अनेक अपमान, अनेक उपेक्षा, अनेक अपेक्षाभंग सहन करूनही ती आपला जीवनप्रवाह तसाच प्रवाहित ठेवते.
              नदीचं ध्येय सागरात विलीन होणं हे सगळ्यांनाच माहीत आहे पण स्त्रीचं ध्येय काय आहे हे तिला तरी कळलंय का?
              डोंगरमाथ्यावरून उगम पावून,
              धावते भेटण्या रत्नाकाराला,
              वाटेत सर्वांना आनंद वाटत,
              वाहते पुढे पुढे।
              माहेरी जन्मून जाते सासरी,
              मिलनाच्या ओढीने,
              सगळ्या कुटुंबात आनंद पेरत,
              वेल वाढवत त्याग सोसत,
              जगते आहे,जगते आहे...।।
©उमा जोशी.

PC: Google

Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...