Skip to main content

आनंद लुटूया....

गेल्याच आठवड्यात मकरसंक्रांत होऊन गेली. आता रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे समारंभ सुरू राहतील. आपल्या संस्कृतीत समारंभांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणाला धरून समारंभ असतोच. हे सगळे समारंभ आपल्याला एकत्र आणतात, संवाद वाढवतात (काही वेळा वादही), आपुलकी माणुसकी समृद्ध करतात.
                       संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या तिळगुळ आणि हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लुटणाऱ्या वस्तू. महाराष्ट्रात सर्वत्रच बहुदा हा सण थोड्या फार फरकाने असाच साजरा करतात. नवविवाहित स्त्रीच्या विवाहापासूनच्या पहिल्या 5 वर्षात काय वस्तू लुटाव्यात याबद्दल काही अलिखित नियम आहेत. त्यानंतर काहीही लुटावे आपल्याला हवे ते.
                       "अहो यंदा काय देऊ सगळ्या बायकांना संक्रांतीचे वाण म्हणून?" यावर अहोंचे उत्तर, "माझा मोबाईल नंबर दे" हे असले पांचट जोक्स सोशल साईट्स वर मुबलक फिरू लागतात संक्रांत जवळ आली की. काय तर म्हणे माझा नंबर दे! किती चुकीचा संदेश जातो या जोकमधून याचा कोणी विचारच करत नाही, ह्याह्या हसायचं आणि फॉरवर्ड किंवा शेअर करायचा हाच उद्योग! आहे का असले उद्दिष्ट आपल्या सणांचे, संस्कृतीचे?
                       हा वेडेपणा एकीकडे तर दुसरीकडे कोणत्या तरी अमुक अमुक गावात खास विधवांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजनाची बातमी. विधवा ! कोणीतरी जळजळीत अंगार कानावर ठेवावा असा जाणवतो हा शब्द. विगत(दूर) आहे धव(नवरा) जिचा अशी ती,  असा सामासिक विग्रह असलेल्या या शब्दाची सामाजिक व्याख्या मात्र थोडी विचित्र आहे. आपल्या समाजात विधवेला कोणी कुंकू लावत नाही किंबहुना तिने स्वतःनेही ते लावू नये असाच समज आहे. खरं पाहिलं तर एखादीचा नवरा जीवित असण्याचा किंवा जीवित नसण्याचा आणि कुंकू लावण्याचा काही संबंध असू नये असं माझं मत आहे कारण नवरा तिच्या आयुष्यात येण्यापुर्वीपासूनच कुंकू तिच्या आयुष्यात असतंच की! त्यामुळे विधवेला मी तुला कुंकू लावलं म्हणजे तुझा सन्मान केला वगैरे भावना स्त्रियांनी बाळगू नये असं आपलं माझं बाळबोध मत.
                       खरं तर हे वाण लुटणे हा प्रकार बऱ्याचशा स्त्रियांच्या स्टेटसचाही प्रश्न बनतो. सोसायटीत अमकीने ते लुटलं, तमकीने हे लुटलं मग मी का मागे राहावं? किंवा एखादीची परिस्थिती नसेल तरी ती सगळ्या आपल्याला बोलावतात मग आपण नको का त्यांना बोलवायला म्हणूनही बिचारी पदरमोड करून हळदीकुंकू आणि वाण समारंभ करते. खरच पण अशा प्रघातांमुळे सामाजिक दरी वाढू लागेल की काय अशीही शंका येते मनात अनेकदा.
                       "काय लुटावे?" या प्रश्नाला एक सरळ उत्तर असेल ,"जे तुला शक्य आहे ते!" काय वाटुया ? दुःख घेऊया ना सगळ्याची वाटून, उपेक्षा हिरावून घेऊया सर्वांच्या , कमीपणा; मानभंग; मनोभंग; तेजोभंग; अपमान; चिंता दूर करायचा प्रयत्न तर करूयात सर्व मिळून आणि सगळ्या जणी मिळून लुटूया फक्त आनंद आनंद आणि आनंद ....
                       ©उमा 24/01/2019

PC: Google

Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...