Skip to main content

मन आणि मनांतरे...

व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे आपल्या मराठीत. प्रसंग एकच पण त्याविषयी मनात उमटणाऱ्या भावना या माणसागणिक बदलतात....
         अनेक घटना आपण आठवून पहा. एका अंगाने तिच्याकडे पाहता ती आनंददायी, यशस्वी अशी वाटते तर तिच घटना दुसऱ्या अंगाने अगदी विरुद्ध भावना उत्पन्न करते. म्हणूनच म्हणतात की संकटकाळीच खऱ्या मित्राची परीक्षा होते. " सुख के सब साथी, दुःखमे न कोई " असं उगाच का गायलंय!
         सुखाच्या, आनंदाच्या, यशाच्या, मिळकतीच्या क्षणी अनेक जण जवळ येतात. वाहवा करतात, अगदी गुळाला मुंगळे चिकटावेत तसे. तसंच या यशात वाटेकरी होणारेही असतात. हे  यश आमच्यामुळेच कसे मिळाले हे वाढवून फुगवून सांगणारेही असतात.
         आणि अगदी त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जो अयशस्वी किंवा पराजित झालेला आहे त्याच्या भोवती सुद्धा मुंगळे असतातच पण ते डंख मारतात. द्वेषाचे विष कालवतात मनात.
         अनेक वेळा आपले कौतुक करणारी व्यक्ती ही आपली आप्त, मैत्र आहे की केवळ जिभेवर साखर आणि मनात हलाहल असलेली आहे हे ओळखणे अतिशय कठीण असते. अशी मायावी मने आपल्या आजूबाजूस खूप असतात. ती पारखता येणं हे एक कसब आहे. मात्र हे कसब अंगी बाणवायाला बराच काळ जावा लागतो. अनेक टक्के टोणपे, अनेक घाव, अनेक जखमा, अनेक व्रण सोसावे लागतात.
         एवढे करूनही अनेकदा अशी व्यक्ती आपण ओळखली तरी आपण काहीही करू शकत नाही.एक तर आपला स्वभाव भिडस्त असतो किंवा ती व्यक्ती प्रभावशाली असते किंवा दगडावर डोकं आपटून घेऊन काही उपयोग नाही हे आपल्याला माहीत असतं.
         पण ही वृत्ती काही एका दिवसात निर्माण होत नाही. ती हळूहळू वाढते. अनेकदा अभिनंदन करतानासुद्धा शालजोडीतले मारणारे असतात. पण हा विचार करत नाहीत की कोणी असंच आपल्याशी वागलं तर?
         अनेकदा काय होतं की समोरच्याचं यश मान्य करण्यासाठी आवश्यक असलेला मनमोकळेपणा आपल्याकडे नसतो. म्हणावं ना की बाबा आहेस तू श्रेष्ठ, वरचढ, कार्यकुशल वगैरे वगैरे. काय बिघडलं? पण नाही माझ्यातला अहंकार मला तसं करण्यापासून रोखतो आणि आपल्या अपयशाला परिस्थिती कशी जबाबदार आहे आणि तो कसा शिरजोर आहे हेच बऱ्याचदा घोकल जातं.
         पण अनेकदा एक व्यक्ती म्हणून विशेषतः एक आई म्हणून मला नेहमी वाटतं की आपण आपल्या बाळाला वाढवतानाच असं वाढवलं तर? की जेणेकरून दुसऱ्याचा आनंद  त्याला आपला  वाटला पाहिजे किमानपक्षी तो  नावडता किंवा क्लेशदायक तरी वाटू नये. गुणग्राहकता, श्रमसंस्कार या गुणांची जोपासना बालपणापासूनच जर केली (म्हणजे जर करू शकलो ) तर वाह काय सुरेख असेल तो समाज! जणू काही
         " अवघा रंग एक झाला,
            आप पर भेद नाही उरला,
            सकळ मेळोनिया केला परमानंद ..."
©उमा: २४/०४/२०१८
            

Comments

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...