Skip to main content
कृष्ण-सुदामा भेट....
              सांदीपनी मुनींच्या आश्रमात भेटलेले हे दोन जीव. एक राजपुत्र तर एक गरीब ब्राह्मण. खरं पाहता त्याच्यात मैत्री व्हावी असं काही साम्य नव्हतंच. पण मनाच्या गाठी पडल्या की मैत्री होतेच.
             अतिशय साधा सरळ गरीब स्वभावाचा सुदामा आणि लाघवी मनकवडा असा श्रीकृष्ण. लोभस मैत्री आणि याचे साक्षीदार उद्धव आणि बलराम. चौघे असायचे एकत्र पण मने जुळली ती कृष्ण सुदामाची.
             जगराहाटीप्रमाणे शिक्षण संपले आणि सारे पांगले. अनेक वर्षे गेली मध्ये. दरम्यान राम, कृष्ण मथुरा सोडून द्वारकेला आले. सगळ्यांचे संसार बहरले राज्य सुरळीत चालू होतेच. जगभर डंका होता द्वाराकेचा.
             पण या सगळ्या काळात काही सुदामा कृष्ण भेटल्याची नोंद नाही. म्हणजे द्वारकेला आल्यावरही खूप वर्षांनी ते दोघे भेटले असावेत. यातून काय कळतंय म्हणजे मला हा ते सांगते.
             सुदामा पहिल्यापासूनच परिस्थितीने गरीब. त्यात मग लग्न संसार मुले बाळे यात गुंतला. आपल्यापरीने गाडा ओढत होता किंवा प्रयत्न करत होता. तेव्हाही त्याला ठाऊक होतंच की आपला मित्र कृष्ण राजा आहे. खूप श्रीमंत आहे. तो आपल्याला सहज मदत करेल. पण म्हणून काय तो लगेच  नाही गेला कृष्णाकडे. स्वतःचे प्रयत्न त्याने सुरूच ठेवले.
             या उलट कृष्णाचं पाहुयात. तो तर काय साक्षात भगवंतच. त्रैलोक्यात काय घडतंय हे एका ठिकाणी राहून पण ओळखणारा. त्याला ककाय कळलं नसेल आपलं मित्र सुदामा अडचणीत आहे ते?  मनात आणलं असतं तर क्षणात त्याने सुदाम्याच्या परिस्थितीचा कायापालट केला असता पण त्याने तसं नाही केलं.
             अनेक वर्षांनी मग पुढे कधीतरी सुदम्याच्या पत्नीने त्याला त्याच्या राजा मित्राकडे मदत मागायला पिटाळले. रिकाम्या हाती कसे जायचे म्हणून पोह्यांची पुरचुंडी सोबत दिली. तिची अपेक्षा होती की आपल्या पतीचा मित्र राजा आहे तर तो आपली मदत करेल. आणि सुदामा निघाला कृष्णभेटीला.
             द्वारकेत आला सुदामा. मित्राला भेटला. त्याच्या प्रेमाने भरून पावला. अगत्याने सुखावला. पण त्याचा धीर होईना मित्राकडे मदतीचा शब्द टाकायला. खरं तर कृष्णाला सगळं कळलं होतच की. वहिनीने दिलेलं पोहे स्वीकारून आनंदाने खाऊन मन भरून आलं भगवंताचं. त्याने सुदाम्याला न मागताच सारं काही दिलं. प्रेमाने त्याची(सुदाम्याची) झोळी काठोकाठ भरली.
             तर मंडळी ही तुम्हाला माहीत असलेली कथा सांगून मला काय साधायचं आहे? ते म्हणजे या मैत्रीतलं मला जाणावलेलं अध्यात्म. पहा हा सुदामा तडक नाही गेला भगवंताकडे. प्रयत्न करीत राहिला आणि शेवटी पत्नीने आग्रह केला तेव्हा गेला. म्हणजे भगवंताच्या वाटेवर जाण्यासाठी प्रेरकाची गरज असते. प्रयत्न आहेतच पण सर्वसाक्षी भगवंतांचे अधिष्ठानही हवेच. यात सुदाम्याचा भगवंतावर विश्वास नाहीये असं नाही पण तो जरा मागे पडतोय एवढंच. तसच श्रीकृष्णाचे. त्याने स्वतःहून नाही सुदाम्याला मदत केली सुदामा त्याला शरण आला तोंडाने नाहीं पण डोळ्याने कदाचित बोलला आणि मगच भगवंताची त्यावर कृपा झाली. म्हणजे आपण जे म्हणतो ना देवाला सगळं दिसत तो करेल सर्वकाही ठीक तर ते तसं नसावं. देवाला शरण गेलं पाहिजे म्हणजे तो नक्की सर्वकाही ठीक करेल.....
             बोला गोपालकृष्ण महाराज की जय !!!

©उमा जोशी.
PC: राही टिकम करंजे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...