Skip to main content

मनाच्या काठावर...

अशा वळणावर येऊन थांबलंय आता आयुष्य
जणू भासतो संपलाच आहे रस्ता
पण तरीही पुढे जाण्याची ओढ...

असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर
अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या...

उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा
धुमारे न फुटती कशाला आता
दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना...

कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली
रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली..

हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे
चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते...

वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला
पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला..

कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं?
गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही...

वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात
आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा
कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू...

आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच.
पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे...

पण नकळत तरी कसं म्हणावं या खेळाला? उतरती कागदावर जी अक्षरे मीच ना ती लिहिली आहेत?
का आताशा माझा मनावर आणि मेंदूवर माझ्याच ताबा नाही राहिला?

खरच असं कधीतरी मन आणि बुद्धी बाजूला काढून  ठेवलं तर कसं वागेल हे शरीर?
मौज वाटतेय मला या कल्पनेची पण मन मात्र सूचक हसतंय...

कळूनही न कळण्याचा आव आणणारी मनोबुद्धि ही किती अकल्पित आणि अतिविचारी आहे नाही...

इथे आपणच आरोपी, आपणच वकील, आपणच फिर्यादी आणि आपणच न्यायाधीश.
काय सुरू आहे या न्यायालयात? कोणता न्याय मागतेय मी? की न्याय मागण्याच्या पडद्यामागे अन्यायाचेच समर्थन सुरू आहे?

कठीणच आहे हा गुंता पण सुटेल अशी आशा आहे, प्रयत्न सोडणाऱ्याच्या पदरी कायमच घोर निराशा आहे.

अपल्यावरही आहे एक न्यायाधीश, जो मांडतोय जमाखर्चाचे हिशोब
येतोय तो आयुष्यात आपल्या फक्त कधी कुठे कसा नाही सांगता येत.

खूप झाले म्हणता म्हणता लक्षात आता येत आहे
हे तर काहीच नाही अजून खूप काही बाकी आहे..

आता भार तुम्हावरच सावळ्या, दयाघना करी सांभाळ, मी नसे तुझी भक्त अपार
परी पार करण्या हा भवताल दे मला हिंमत अपार...

© उमा जोशी ०९/१२/२०१९

PC: Mr. Tanmay Joshi

Comments

  1. खूप छान
    हे असलं द्वंव प्रत्येकाच्या मनात रोज
    ह्यात कोणीच फिर्यादी नाही व सगळेच न्यायाधिश

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...