Skip to main content

परिवर्तन

 काल सहज सुधा मूर्तींचा एक लेख वाचनात आला. 'विशीतील आदर्शवाद आणि चाळिशीतील वास्तवतावाद'! 

खरंच आहे ऐन उमेदीत विशीत आपण फारच आदर्शवादी असतो. तारुण्यातील उसळणारं रक्त असेल, नुकताच लागलेला शैक्षणिक स्वातंत्र्याचा वारा असेल किंवा अनुभवांची तोकडी शिदोरी असेल ; कारण काहीही असेल पण त्या वयात आपल्या कल्पना फारच आदर्शवादी असतात हे खरं!

त्याउलट चाळीशीत आपण वास्तव स्वीकारायला सुरुवात करू लागलेले असतो. शिक्षण आणि त्याचे उपयोजन यातील दरी सांधत सांधत जीव मेटाकुटीला आलेला असतो. अनुभवांचं बऱ्यापैकी मोठं आणि जड गाठोडं आता आपल्यापाशी असतं. नोकरी-धंद्यातलेच नाही तर वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक चढ उतार सहन करून पोळलेले आपण आदर्श सोडून हळूहळू वास्तव स्वीकारायला लागलेले असतो.

आता हे स्वीकारणं काही वेळा जड जातं पण स्वीकारण्यवाचून गत्यंतर नसतं. मागे वळून पाहताना आपल्याच लक्षात येतं की आपण स्वतःविषयी फारच अवास्तव कल्पना बाळगल्या होत्या आणि कितीही काहीही केले तरी पूर्ण होणे शक्य नाही. काही जण हे वास्तव सहज स्वीकारतात तर काही जणांना फार त्रास होतो वास्तव स्वीकारताना.

पण हे वास्तव स्वीकारणं म्हणजेच स्वतःत घडवून आणलेलं परिवर्तनच होय. बदल हा सृष्टीचाच नियम आहे. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल घडवून सारी सृष्टी अजूनही टिकून आहे. 'Survival of the fittest' जो काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बदलला तो टिकला , जो नाही बदलला तो मोडला, नामशेष झाला.

म्हणूनच जरं टिकून राहायचं असेल तर बदल, परिवर्तन आवश्यक आहे. मग हे परिवर्तन आपण मनापासून स्वीकारलं तर सोपं होईल आणि आनंददायी होईल आपल्यालाही आणि आपल्या सोबत असणाऱ्यांनाही. परिस्थितीने लादलय म्हणून परिवर्तन करायला गेलो तर कदाचित ती प्रक्रिया क्लेशदायक ठरेल आणि म्हणूनच काळाची पावलं ओळखून वेळीच परिवर्तनशील राहणं हे चांगलंच नाही का?

© उमा जोशी १७/११/२०२०


Comments

  1. वास्तव स्वीकारणं म्हणजेच स्वतःत घडवून आणलेलं परिवर्तनच होय. सुंदर वैचारिक लेखन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...