Skip to main content
विश्वबंधुत्वाच्या दिशेने एक पाऊल...

                मित्रांनो आज ११ सप्टेंबर. हा दिनांक आणि अमेरिका यांचं एक पक्के नातं आहे. दोन वेगवेगळ्या कारणांनी या दिवशी पूर्ण अमेरिकाच काय पण सारं जगच हादरलं होतं. फक्त एक धक्का सुखद होता तर दुसरा दुःखद. एकाने सर्वांना एकत्र येण्यासाठी साद घातली तर दुसऱ्याने दहशत पसरवली. एकाने सर्वांना प्रेमाने ज्ञानाने आपलेसे केले तर दुसऱ्याने मात्र सगळ्यांना सळो की पळो करून सोडले.
                 अगदी अचूक ओळखलंत सगळ्यांनी. ११ सप्टेंबर २००१ या रोजी ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित अशा पेंटागॉन तसच वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतींवर विमाने वापरून हल्ला केला. अपरिमित वित्त व जीवित हानी झाली आणि साध्य काय झालं तर काहीच नाही. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा हव्यासापोटी निरपराध जीवांचे बळी मात्र गेले.
         आणि याच्या अगदी उलट घडलेलं ११ सप्टेंबर १८९३ ला. जागतिक सर्वधर्म सभेत पौर्वात्याचा ज्ञानसूर्य अमेरिकेच्या आकाशात तळपला असा की त्याने सर्वांना प्रेमाची ज्ञानाची तपश्चर्येची आपलेपणाची ऊब दिली. परदेशातील सर्व जनांना आपले बंधू आणि भगिनी म्हणून संबोधलं आणि त्यांच्यासोबत प्रेमाचं नात जोडलं. पश्चिमात्यांच्या मनांत हिंदू धर्म हिंदू भूमी विषयी असणाऱ्या खुळ्या कल्पना दूर करून सत्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहचवला. अभिमानाने आणि ताठ मानेने आपल्या धर्माची तत्वे सादर केली आणि साऱ्या जगाला आपलेसे केले ते स्वामी विवेकानंदांनी!
          मला वैयक्तिक कोणालाच कोणत्याच धर्माला दोष द्यायचा नाही. पण मी हिंदू धर्मात जन्म घेतला हे मी माझे सौभाग्य समजते. माझा धर्म कोणावरही अन्याय, अत्याचार करायची मला सूचना देत नाही की परवानगी ही देत नाही. सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो असं शिकवणार माझा हिंदू धर्म, ज्याची विजयपताका त्रिखंडात मिरवणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा मला सार्थ आदर वाटतो. त्या महान तपासव्याने जे काही केले, सांगितले त्याचे आकलन होणे आणि त्याच्याच पाऊलवाटेने चालणे हे योग्यच वाटू लागते.
        आजच्या या दिनी या दोन्ही प्रसंगाचे स्मरण होते आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न करतो मी काय व्हावं? कशाप्रकारे साऱ्या जगाला कवेत घ्यावं? निश्चितच प्रेमाने! दहशतीचे नाहीच नाही! स्वामीजींनी आपल्या धर्माला मिळवून दिलेल्या मानसन्मानाला कोठेही कमीपणा येणार नाही, झाली तर त्यात वृद्धीच होईल असा निर्धार करून आजच्या या विश्वबंधुत्व दिनानिमित्त एक पाऊल पुढे टाकू! या सारे मिळून या विश्वाला आपलेसे करूया!

©उमा जोशी ११/०९/२०१९

PC: Google.
         

Comments

  1. खूप छान लिहितेस उमा.
    स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल कॉलेज ला असताना वाचलं होतं. त्यांचे कार्य, विचार याने मन भारून गेले.

    ReplyDelete
  2. खुप छान विचार मांडले आहेस.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...